झाडाझडती✍️विनोद देशमुख
——————————————
रिक्षावाले सुसाटले
कारवाले पिसाटले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड घडवून मविआचं सरकार पाडलं आणि भाजपाच्या मदतीनं स्वत:चं सरकार स्थापन केलं, याचा ठाकरेंना, शिवसैनिकांना राग येणं स्वाभाविक आहे. पण म्हणून तुम्ही, आज संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्याला काहीही म्हणाल का ? शिंदे हे एकेकाळी (आॅटो)रिक्षा चालवत असत, याचा उल्लेख टिंगलटवाळीसाठी करायचा की लोकशाहीचा चमत्कार म्हणून अभिमानानं करायचा ? परंतु, संतापाच्या भरात हे भान विसरून स्वत: उद्धव ठाकरेच जेव्हा रिक्षा प्रतीकाचा वापर शिंदेंची टर उडवण्यासाठी करतात, तेव्हा शतकाकडे जाणारी आपली लोकशाही कोणीकडे वाटचाल करीत आहे, याची चिंता वाटू लागते.
शिंदेंच्या महाबंडानं ठाकरेंच्या खुर्चीला धडक देताच शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची ‘रिक्षा’ काढली संजय राऊत यांच्यासह अनेक बोलघेवडे शिवसैनिक ‘रिक्षावाला’ म्हणत शिंदेंवर तुटून पडले. पण, रिक्षा जी निघाली ती थेट मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर जाऊनच थांबली त्यामुळे संतापून उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंना टोमणा मारला- “रिक्षा सुसाट सुटली आहे. केव्हा अपघात होईल सांगता येत नाही.
” याला शिंदेंनीही जबर उत्तर दिलं. ते म्हणाले- “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.” तीनचाकी रिक्षानं चारचाकीवर मात केली. (तेव्हा मी लिहिलं होतं- “ठाकरेंच्या मर्सिडीजवर धडकतोय् रिक्षावाला !”)
गेले नऊ महिने रिक्षा अपघाताविना धावत आहे आणि ही फिरती रिक्षा शिंदेंच्या माजी सहकाऱ्यांना बघवत नाही. ठाकरेंचे विश्वासू आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी रिक्षाचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. यासाठी त्यांनी शरद पवारांची साक्ष काढण्याचा प्रयत्न केला, जो अंगलट येणार असं दिसताच घूमजावही केलं.
सावंत म्हणाले- 2019 मध्ये मविआचे मुख्यमंत्री ठरवताना शरद पवारांनी विचारलं होतं की, “काॅंग्रेसमध्ये दोन माजी मुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीतही बरेच ज्येष्ठ नेते आहेत. तुम्ही सारे एका रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कराल काय ?” हे वाक्य व्हायरल झालं अन् सावंत घाबरले. मविआच्या शिल्पकारालाच आपण अडचणीत आणलं, हे लक्षात येताच त्यांनी बळेबळे खुलासा केला- वरील प्रसंग खराच आहे. पण, पवार साहेब एकनाथ शिंदे म्हणाले होते. रिक्षावाला हा शब्द माझा आहे. माझ्या तोंडून निघून गेला.
याचा अर्थ, सावंतांच्या दृष्टीनं मुख्यमंत्री शिंदे रिक्षावालाच आहेत. पक्षप्रमुख असलेल्या आपल्या साहेबांना शिंदेंनी मात दिल्याचं त्यांना पचवता येत नाही, हे उघड आहे. घराणेशाहीवादी पक्ष असेल तर मग स्वामीनिष्ठा दाखविण्यात सारेच पुढे असतात आणि त्यांच्यात स्पर्धाच लागते. त्यातलाच हा प्रकार आहे. लोकशाहीचा, संविधानाचा एकीकडे सतत जप करायचा अन् दुसरीकडे संवैधानिक पदाचा जाहीर अपमान करत राहायचं, त्याला हिणवत राहायचं, ही कोणती मनोवृत्ती ?
हे हुकुमशाही वृत्तीचं लक्षण आहे. राजेशाही, सरंजामशाही, सामंतशाही, जहागिरी, इजारदारी, घराणेशाही ही सारी त्या हुकुमशाहीचीच वेगवेगळी रूपं आहेत. लोकशाहीत त्यांना स्थान नसलं तरी, त्यांचे अंश अनेक ठिकाणी कायम असल्याचं वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अनुभवास येत असतं. त्यातही राजकारणानं आपलं संपूर्ण जीवनच व्यापलेलं असल्यानं या क्षेत्रातील अनुभव डोळ्यात येण्याइतपत जास्त असतात आणि माहितीच्या स्फोटाच्या आजच्या काळात ते वेगानं सर्वांपर्यंत पोहोचतही असतात. म्हणूनच, राजकारणातील हे प्रकार सर्वाधिक चर्चेचे विषय ठरतात.
भारतात गेली पाऊणशे वर्षे हेच सुरू आहे. स्वातंत्र्याची चळवळ चालविणारा, सर्वात पहिला काॅंग्रेस पक्ष नेहरू-गांधी घराण्याचा गुलाम बनल्याची स्थिती आहे. जवळजवळ सर्वच प्रादेशिक पक्ष हे कोणत्या ना कोणत्या कुटुंबाच्या मालकीचं दुकान आहे. स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या इतर पक्षांमध्येही विविध स्तरांवर कुटुंबशाही जाणवते. त्यातून, आम्ही श्रेष्ठ आणि अनुयायी कनिष्ठ, अशी लोकशाहीविरोधी भावना वरिष्ठ पातळीवर व्यक्त होताना सर्रास दिसते. यातूनच दुय्यम नेत्यांना, कार्यकर्त्यांना किंमत द देण्याचे प्रकार घडत असतात. समस्त लोकशाहीप्रेमी जनतेनं अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या, पण गंभीर घटनांची योग्य दखल घेतली तरच लोकशाही वाचू शकते.
शिवसेनाप्रमुखांनी एकेकाळी अतिसामान्य माणसांचा मानसन्मान वाढविला, ही परंपरा स्वार्थासाठी विसरली जात आहे, याचं सर्वाधिक दु:ख आहे. यातून लोकशाहीविरोधात काळ सोकावत आहे. कदाचित उद्या न्यायालय आणि मतदार तुम्हाला ‘न्याय’ देतीलही. पण आज तुम्ही त्याच लोकशाहीची सतत अवहेलना करीत आहात, याची नोंद इतिहास घेतल्याशिवाय राहणार नाही, हे विसरू नका